Vaibhav Gaikwad's Blog

Wednesday, December 21, 2011

मंदिराचा धंदा


काय होता इंजिनिअर, काय होता डॉक्टर?
'एमबीए' वाल्यांना तरी स्कोप आहे कुठवर?
बीएससी-बीकॉम वाल्यांना तरी कुठे जॉब मिळतो?
बीए करणारा तर बिचारा आयुष्यातून उठतो.
किती शिका, XXX मरवा, आहे तरीही वांदा
सगळ्यात भारी भाई आपला मंदिराचा धंदा

गावी जावे, स्वस्तामध्ये प्लॉट एखादा घ्यावा
स्वस्तातला एखादा देव त्यात पुरावा
मग करावा बोभाटा, बायकोला दृष्टांत झाला
गाव सगळे जमले, की ऐटीत देव उकरावा
देवभोळी माणसे, लगेच हात जोडतील,
सगळी त्याची करणी म्हणत मूर्तीच्या पाया पडतील,
छोटेसे बांधावे मंदिर, स्टॉल द्यावेत भाड्यानी
पंचक्रोशीत मार्केटिंग करावे, भोंगेवाल्या गाड्यांनी
पेपरात छापून येईल, याची पुरी सोय करावी
एकदा गर्दी चालू झाली की चिंता सारी विसरावी
सुरुवातीला दक्षिणेचा गल्ला असेल थोडा मंदा....
पण सगळ्यात भारी भाई आपला मंदिराचा धंदा!

Monday, December 19, 2011

सी. के. नायडू - भारतीय क्रिकेटचे आद्य गौरवस्थान


आज एका मित्राशी chatting करताना सी. के. नायडूंचा विषय निघाला. निमित्त होते भारतातील खेळाडूंना जर आता भारतरत्न मिळणार आहे, तर मरणोत्तर भारतरत्न कुणाला द्यावे? मी अर्थातच नायडूंचे नाव घेतले. मुळात माझ्या इतर मित्रांप्रमाणे क्रिकेट हा काही माझा धर्म नाही - मी बॉलीवुडवाला माणूस. शिवाय मी मुंबईचा. मुंबईत क्रिकेट हा खेळण्याचा अथवा पाहण्याचा नसून चर्चा करण्याचा विषय आहे. त्यामुळे माझ्या मित्राच्या मते, मला नायडूंबद्दल फारशी माहिती नसावी. इथे उल्लेखाची बाब अशी की आधी सांगितल्याप्रमाणे, मुंबईतील अशा अनेक चर्चांमध्ये मी नायडूंचे नाव लहानपणापासून ऐकेलेले आहे, त्यांच्याबद्दल वाचलेले आहे. आपल्याकडे मुळातच इतिहासाबद्दल अनास्था. त्यात क्रिकेटच्या इतिहासाबद्दल जितकं बाहेरच्यांनी लिहिलं आहे - तितक्यातच आपण खुश असतो. आपली देशातील आपल्या माणसांबद्दल बाहेरच्यांची मते वाचून अंदाज लावणे तितकेसे सोपे नसते. पण सुदैवाने सुमारे दोन वर्षांपूर्वी नायडूंच्या कन्येचे 'सी. के. नायडू : अ डॉटर रीमेम्बर्स' हे पुस्तक वाचनात आले, आणि त्यातून कधीही न वाचलेले, न ऐकलेले वा न उमजलेले नायडूंचे चित्रण लक्षात आले.

Wednesday, November 16, 2011

एक डाव - मायावतीचा


उत्तरप्रदेशात जशा निवडणुका जवळ येऊ लागल्यात, तसे सर्व पक्षांनी आपापल्या बाह्या सरसावायला सुरुवात केलेली दिसतेय. मायावतीने मात्र एक भलतीच मागणी करून बाकीच्यांचे धाबे दणाणून सोडलेले दिसतेय. मायावतीच्या मते, तिच्या मंत्रिमंडळाने उत्तर-प्रदेशचे पूर्वांचल, बुंदेलखंड, अवध प्रदेश आणि पश्चिम प्रदेश अशा चार भागात विभाजन करण्यास अनुकुलता दाखवली असून, प्रशासकीय कामात सोपेपणा आणण्यासाठी आणि एकूणच उत्तर प्रदेशच्या प्रगतीसाठी येत्या विधानसभा अधिवेशनात सदर प्रस्ताव अग्रस्थानी मांडला जाणार आहे.

अर्थातच नुसत्या विरोधाला विरोध करण्यासाठी मुलायमसिंह सारखी माणसे नक्षलवादाच्या वाढीचे भूत उभे करीत आहेत. आणि मुंबईत राहून पंचतारांकित पाहुणचार झोडणारे आता सीमावर्ती भागाच्या सुरक्षेबाबत मत व्यक्त करीत आहेत. कुणी मानो-ना मानो, मायावतीवर एक दलित म्हणून आतापर्यंत जो काही अन्याय करण्यात आला आहे, मायावतीने त्याच्या प्रत्युत्तरात चांगले काम करत कायम समोरच्याच्या थोबाडीत मारून दाखवली आहे. आता सुद्धा मायावतीच्या म्हणण्याकडे मुद्देसूद पाहिल्यास तिच्या म्हणण्यास खरोखरीस अर्थ असल्याचे ध्यानात येते.

Monday, November 14, 2011

स्वातंत्रोत्तर राजकीय घडामोडी





बरेच दिवस झाले, अण्णा हजारे यांच्या जन-लोकपाल आंदोलनास सुरुवात होऊन. पहिल्या फेरीत अण्णांनी निर्विवाद यश मिळवले. आणि त्यांचे श्रेय निश्चितच अण्णांच्या स्वच्छ प्रतिमेला आणि प्रामाणिक ध्येयांना जाते. पण सुरुवातीपासून अण्णांची चळवळ 'टीम अण्णा' च्या इतर सदस्यांमुळे वादग्रस्त राहिलेली आहे. सुरुवातीला भूषण पिता-पुत्र, नंतर केजरीवाल आणि आता अगदी किरण बेदीसुद्धा या वादाच्या फेऱ्यांतून सुटलेले दिसत नाहीत. अण्णांच्या मागून वाङबाण चालवणाऱ्या या सरदारांमुळे आता खुद्द अण्णा आणि त्यांच्या लोकपाल बिलाच्या मागणीभोवती संशयाचे धुके दाट होत चालले आहे. अण्णांच्या पहिल्या फेरीचा आढावा आपण मागे 'अण्णामय' या सदरात घेतला आहे. त्यातील बरेच प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत, पण सर्वात मोठा प्रश्न हाच की - टीम अण्णाचे भविष्य काय असणार आहे?

Thursday, November 3, 2011

Top 10 of October '11






नमस्कार मित्रांनो, दर महिन्याप्रमाणे याही महिन्यात आपल्या ब्लॉगचे 'Top 10' आर्टिकल प्रकाशित होत आहे. एरवी मी हे आर्टिकल महिना-अखेरीस लिहितो, फक्त शेवटची आकडेवारी येणाऱ्या एक तारखेला अद्ययावत करून एक तारखेलाच पोस्ट प्रकाशित करतो. या महिन्यात मात्र midterms च्या धामधुमीत वेळच मिळेना. महिना-अखेरीस असणाऱ्या परीक्षा आणि assignments पाहता बऱ्याच आधी मला कल्पना आली होती, की या वेळेचा 'Top 10' वाला आर्टिकल उशिरा येणार. मधेच एक तारखेला मात्र मी सगळे stats नोंदवून ठेवले होते, कारण वेळ मिळेल तेव्हा मला त्यांचा वापर या पोस्टमध्ये करायचा होता.

आम्ही तुला खूप मिस करतो, लक्ष्या. :(
योगायोग असा की आज जेव्हा हा लेख प्रकाशित होतोय - तो नेमका आपल्या आवडत्या लक्ष्याचा जन्मदिवस आहे. आज तो आपल्यात नसला, तरी आपलं मन मात्र ते कधीच मानायला तयार नसते. लक्ष्या भले सर्वोत्कृष्ट अभिनेता नसला, आणि त्याचे अतिरेकी विनोद कधी-कधी वैताग आणायचे, तरी तो 'लक्ष्या' होता. आपला लक्ष्या. बाकीच्यांना भले त्याची किंमत असो-नसो, एक मराठी माणूस म्हणून लक्ष्या आपल्या आयुष्याचा एक भाग होता. त्याला जाऊन इतकी वर्षे झाली, तरी आपल्या घरातील-कुटुंबातील एखादा व्यक्ती जाण्याने होते तशी एक पोकळी आपल्या सर्वांना अजून जाणवत राहते. पूर्वी टीवीवर त्याचे नंतर-नंतरचे टुकार चित्रपट लागल्यास channel बदलणारा मी, हल्ली युट्युबवर त्याचे विडीयो बघत बसतो. तेव्हा त्याची कमतरता फार प्रकर्षाने जाणवते. त्याच्या अचानक जाण्याने, आपण असणाऱ्या माणसाला किती गृहीत धरत असतो आणि तो गेल्यावर त्याची कशी किंमत कळते याचा चांगलाच अनुभव घेतलाय मी.

Monday, October 3, 2011

फेक फेसबुकिंग


हल्ली मी रोज फेसबुकवर पाहतो - माझे बरेच मित्र कुठल्या ना कुठल्या देखण्या मुलींना friend म्हणून add करत असल्याचे. रोज रोज यांना या मुली कुठून मिळत(हो, मिळत) असतील, की हे मित्रलोक फेसबुकवर फक्त या माल पोरी शोधायलाच येतात? बरेच दिवस इकडचे-तिकडचे असे notifications बघून विचार केला की का नाही आपण यांना सावध करण्यासाठी एखादा लेख लिहावा.

पूर्वी ऑर्कुटवर आणि आता फेसबुकवर मुलींच्या नावाने उघडलेले फेक अकाउंट्स सर्वत्र दिसतात. या मुलींची नावे पण अशी की कुणाला शंका येणार नाही अकाउंट नकली असल्याचे. अदिती मल्होत्रा, नेहा महोपात्रा, कीर्ती गांगुर्डेकर, किरण यादव, सोनाली कदम अशी नावे पाहिली की लगेच आपण क्लिक करून बघतोच कोण आहे ते. सोबत एखाद्या उफाड्याच्या मुलीचा (बहुधा देसीच) फोटो लावलेला असतो. कधी एकच फोटो असतो तर कधी अख्खा अल्बम देखील. हे फोटो असेच कुणाच्या तरी अकाउंट वरून ढापलेले असतात. त्या बिचाऱ्या मुलींना तर याची कधी कल्पनाही नसावी.

Sunday, October 2, 2011

स्वप्नातले गांधी


काल रात्री स्वप्नात मी कायच्या-काय भरकटलो होतो
चक्क बापू आले होते समोर, गप्पा मारत बसलो होतो
मी म्हंटलं, काय पप्पा, अचानक कसं काय केलंत येणं?
बापू हडबडले, म्हणाले 'पप्पा'शी माझं काय देणं-घेणं

मला वाटलं भारतातले लोक मला अजूनही बापू म्हणतात
म्हंटलं, तसं बोलणाऱ्यांना लोक आता गावंढळ म्हणून गणतात
उगाच तुम्ही बापू इंग्रजांना हाकलण्यासाठी लढलात
इंग्रजाळलेल्या जनतेसाठी उभा जन्म कष्टात काढलात

बापूंना काही उमजेना, डोक्यावर हात मारत म्हणाले, हे राम
म्हंटलं, तो तर राजकारणात कामाचा हो, इथे त्याचं काय काम?
असं कसं बोलतोस बाळा, अरे हीच का तुमची आस्था?
अरे, रामराज्याच्या स्वप्नासाठीच तर केली ना इतकी पराकाष्ठा?

बापू, ते रामराज्याचं प्रकरण तर आमच्यासाठी केव्हाच मिटलंय
जबाबदारी मोठी, म्हणून ते आम्ही दोन पक्षात वाटलंय
राम दिलाय भाजपला, ते त्याच्या नावाने गळे कापतात
राज्य दिलंय कॉंग्रेसला, ते बसून नुसते पैसे छापतात

'ते' बसून पैसे छापतात, तर बाकी १०० कोटी काय करतात?
त्यांच्या पैशांच्या बातम्या ऐकतात, आणि उपाशी पोटी मरतात.
भारत आता काही गरीब नाही बापू, पैसा वाढलाय मस्त
लाखो कोटींचे तर घोटाळेच होतात, कुठल्याही देशापेक्षा जास्त

तुम्ही म्हणालात गावाकडे जा, गाव नावाला उरलंय मात्र
दिवसाकाठी शेतकरी मरतात, लक्ष देत नाही तिकडे कुत्रं
शेतकी सोडून इकडे साऱ्यांनी क्रिकेटचा बाजार मांडलाय
बावीस यार्डाच्या खेळपट्टीवर अख्ख्खा कुबेराचा खजिना सांडलाय

शंभर धावा करणाऱ्याला, जाहीर सभेत भूखंड मिळतो
आणि शंभर क्विंटल पिकवणारा, शेवटी टिक-२० गिळतो
गरिबांच्या पॅकेजपेक्षा मोठं असतं यांच्या जाहिरातींचं उत्पन्न
आणि ढोंगी बाबांच्या कृपेवर जगणारेच होतात आता संपन्न

तुमचा सत्याग्रहाचा मंत्र मात्र आजही प्रचंड यशस्वी ठरतो
व्यवस्था बदलायला निघालेला, अख्ख्या व्यवस्थेला वेठीस धरतो
सत्याग्रहांची सुद्धा बापू आजकाल फॅशन झाली आहे
एका वाल्मिकीच्या मागे, आता ढीगभराने वाली आहेत.

तुमच्या जयंतीला सरकार सुट्टी देऊन पेंगा काढत बसते
तुम्हाला श्रद्धांजली द्यायला शेवटी बेवड्यांचीच मैफिल असते
तुमच्यामुळे dry day ला दारू प्यायला सरकार नाही म्हणते
आणि गरिबाला खायला धान्य नाही, कारण त्याची सरकारी दारू बनते

तुमचं म्हणे बापू, नेताजींशी पटायचं नाही, वैचारिक मतभेदांचा असर
आम्ही त्याचा बदला एकदम जबरी घेतलाय, अगदी बिना कसर
राजकारण्यांना आता आम्ही नेताजी म्हणून हाक मारतो
कचकन शिवी घातल्यासारखी, सुभाषबाबूंची लाज काढतो

बापू, तुमचा वस्त्र-त्याग सुद्धा आम्ही अजूनही विसरत नाही,
चार विती कपडा आजकाल पोरींच्या अंगभर पसरत नाही
पावलोपावली तुमच्या तत्वांचे अगदी हिडीस दर्शन घडतात
अहो, सत्याग्रहाला पाठींबा म्हणून पोरी नागडे फोटो काढतात

फक्त आमचीच नाही बापू, तर तुमची पण पत वाढलीय
तुमच्यासारख्या फाटक्या फकिराची आम्ही हजारची नोट काढलीय
त्यारूपे तुम्ही थेट भ्रष्टाचाऱ्यांच्या तिजोरीत आराम झोडता
थेट निवडणुकीला बाहेर येऊन, एकमेकांची वोट-बँक फोडता

धडपडत उठले, तडक निघाले, मी विचारलं, बापू काय झालं?
गलबलून बोलले ते एकदम, आता बाकी तरी काय राहिलं?
माझ्या नश्वर शरीराला गोडसेने संपवल्याच्या बाता करता?
अरे त्याने एकदा मारलं, तुम्ही मला रोजरोजच मारता!!

- वैभव गायकवाड
(शुद्धीत असलेला गांधीवादी)


Bookmark and Share

Saturday, October 1, 2011

Top 10 of September '11







दर एक तारखेला जुना महिना संपतो, आणि दर एक तारखेला हा नवीन पोस्ट येतो. कधी-कधी सांगण्यासाठी खूप काही असतं, तर कधी काहीच नसतं. या महिन्यात सांगायला खूप काही आहे, पण वेळेचं बंधन असल्याने जरा आवरतं घ्यायला लागणार आहे. हा एकूणच महिना असाच गेलेला आहे.

या महिन्यात प्रकाशित होणाऱ्या लेखांची यादी अपेक्षेपेक्षा फारच रोडावलेली आहे. लता मंगेशकर, हृषीकेश मुखर्जी आणि आज प्रकाशित करायचा योजलेला मजरूह सुलतानपुरी यांच्यावरचे लेख कधी पूर्णच नाही होऊ शकले. देव आनंदवरचा लेख मी जुलैमध्ये प्लान केला होता, नशीब इतकेच की निदान तो तरी लेख आयत्या वेळी लिहून पूर्ण झाला आणि प्रकाशित होऊ शकला. अर्थात, देवाचं कार्य ते. तो त्याला अर्धवट कसा राहू देईल. तरी बऱ्याच गोष्टी लिहायच्या राहिल्या. खास करून देव आनंदच्या गाण्यांबद्दल. पण हरकत नाही, कधीतरी देव आनंदच्या गाण्यांसाठी एक खास लेख लिहू, नक्कीच worth आहे.

Monday, September 26, 2011

देव आनंद





आज देव आनंदचा वाढदिवस. त्याला शुभेच्छा देताना असा विचार मनात येणे साहजिक आहे की वाढदिवस तर आपल्यासारख्या मर्त्यांचा होतो - देव आनंदचा वाढदिवस करून, त्याच्या आयुष्याची वर्षे मोजणे त्याच्या नवतरुणाईला शोभा देईल का? ८८ व्या वयात त्याचा १८ वर्षाच्या तरुणाला लाजविणारा उत्साह पाहता - नाही!

१९४३ साली, वयाच्या १९ व्या वर्षी लाहोर युनिवर्सिटीतून पदवी मिळवून, देव आनंद मुंबईला पोटापाण्यासाठी आला. खिशात होते अवघे ३० रुपये. इंग्रजी, हिंदी, उर्दू आणि पंजाबी अशा बहुभाषिक ज्ञानाचा फायदा घेऊन त्याने सैन्यात नोकरी पत्करली. दुसऱ्या महायुद्धाच्या त्या दिवसांत, सैनिकांची पत्रे चाळून त्यातला आक्षेपार्ह मजकूर रोखण्याचे काम त्याच्याकडे होते. खडतर परिस्थितीत दिवस काढणाऱ्या सैनिकांनी आपल्या बायकांना, प्रेयसींना लिहिलेल्या नाजूक प्रेमपत्रांनी विशीतल्या देववर शृंगाराचे पहिले संस्कार केले. अशातच देव आनंद एकदा प्रभातच्या नजरेस पडला आणि प्रभातने त्याला १९४७ सालच्या 'हम एक' मधून पहिला ब्रेक दिला. फाळणीच्या सुमारास आलेला हा चित्रपट चालणे तर अशक्यच होते. पण इथे त्याची गाठ त्यावेळी चित्रपटांत कोरिओग्राफर बनण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुरुदत्तशी पडली. १९४८ सालच्या 'जिद्दी'ने दोघांना सहारा दिला आणि भारतीय चित्रपटसृष्टीचे एक नवे पर्व चालू झाले.

Wednesday, August 31, 2011

Top 10 of August '11






नमस्कार मित्रांनो, आज या महिन्याचा Top 10 चा लेख प्रकाशित करताना ईदचा शुभ-मुहूर्त मिळाला. सगळे सुट्टी घेऊन आज घरी असतीलच, शिवाय उद्यापासून गणेशोत्सव देखील आहे. चाकरमान्यांपासून खंडणी-बहाद्दूर मंडळापर्यंत सर्वांनी गणपतीच्या स्वागताची तयारी केली असेलच. म्हणून या लेखाला सुरुवात करण्याआधी वैभव गायकवाड आणि परिवारातर्फे सर्वांना ईद आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा.

ऑगस्ट महिना सुरु होताना काही खास होईल असं वाटत नव्हतं. हा, मी भारतातून इकडे येणार होतो परत, नवीन सत्र सुरु होणार होते, पण या अपेक्षित गोष्टींखेरीज काही खास होईल असं वाटलं नव्हतं. अर्धा महिना उलटून गेला आणि धक्कादायक बातमी आली - शम्मी कपूर वारल्याची. त्याच्या वयोमानानुसार हे होणार होतेच, पण सगळ्याच घटनांना आपले मन स्वीकारत नाही. शम्मी कपूर होता तेव्हा जितकं त्याबद्दल खास वाटलं नाही, त्याहून कितीतरी जास्त वाईट वाटलं तो गेल्यावर. कपूर घराण्याची घराणेशाही पाहता 'राज कपूर' त्यांचा छत्रपती होता, पण शम्मी रूढार्थाने त्यांचा 'प्रिन्स' होता. तो त्याच रुबाबात जगला आणि त्याच ऐटीत त्याने एक्झिट घेतली. वर्षानुवर्षे बिछान्यात खितपत पडून मृत्यूची वाट बघत बसणे त्याचा स्वभावात बसले देखील नसते. शम्मी कपूर वरती एक खूप चांगली 'biography' राजश्रीने केली आहे. ती निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. मी खाली जोडत आहे, वेळ मिळाला तर जरूर पहा.

Sunday, August 7, 2011

दादा कोंडके



दादा कोंडके - नाव घेताच नाक मुरडायची आपल्याकडे फॅशन आहे. अतिसाधारण चेहरा, अगदी माथाडी कामगारांसारखा अवतार, कंबरेला लटकणारी हाफ-चड्डी आणि किंचित अस्पष्ट आवाजातले द्विअर्थी संवाद याहून वेगळी अशी ओळख लोकांना नसते, आणि त्यांना ती तशीच ठेवायची असते. सर्वसाधारणपणे या लोकांना इतकीही कल्पना नसते, की मल्टी- प्लेक्सच्या बाहेर देखील रसिक जनता असते. जे या लोकांना आज कळत नाही, ते दादांना त्यावेळी कळले होते, आणि त्यांनी या जनतेची नाडी अचूक पकडली होती म्हणूनच सलग नऊ चित्रपटांच्या रौप्य-महोत्सवाने मराठी चित्रपटाची गुढी गिनीज बुकात रोवली. पण हे आजच्या यश चोप्रा, करण जोहरच्या अनुयायांना कळत नाही, हे समाजाचे दुर्भाग्य. त्यात मराठी चित्रपटांबद्दल असणारी अनास्था. हिंदी चित्रपट आवडीने बघणाऱ्या मराठीजनांना हे माहित असतं की रजनीकांत अमिताभचा बाप आहे, आणि उत्तर भारतात रविकिशन शाहरुखला कच्चा खातो, पण मराठी सिनेमाला कधी हिंदी इतका भाव देत नाहीत. राज कपूरचं, गुरुदत्तचं, विजय आनंदचं नाव हे लोक अदबीने घेतात, पण 'प्रभात' यांना माहित नसते. (ज्यांना विजय आनंद वा गुरुदत्तसुद्धा माहित नसतो, त्यांना आपण जाहीर फाट्यावर मारतो) दादांच्या बाबतीत हे देखील झालं, शिवाय जाणीवपूर्वक हेटाळणी झाली ती वेगळीच.

Monday, August 1, 2011

Top 10 of July'11



हुश्श! शेवटी एकदाचा वेळ मिळाला ब्लॉगकडे बघायला. इथे मुंबईत आल्यापासून तर रोज धावपळ....भेटाभेटी आणि सरकारी कामे - आणि त्यासाठी मुंबईच्या रस्त्यांतून जीवघेणा प्रवास. हे कमी होतं की काय, आता पावसाने थैमान घातलंय. आजसुद्धा सकाळी वरळी, तिकडून एअरपोर्ट, मग नेरूळ आणि संध्याकाळी कल्याण असा बेत होता. जास्त ताप नको म्हणून कल्याणचं काम रद्द केलं आणि वरळीला जायला निघालो. ऐरोलीतून बाहेर पडलो, पूर्व द्रुतगती महामार्ग (Eastern Express) पकडला आणि तुफान पाऊस चालू झाला. जेमतेम कन्नमवारपर्यंत गेलो, तिथून पुढे अमर-महालच्या पुलापर्यंत ट्रॅफिक. पाऊस तर होताच, पण आजचे श्रेय तर प्राधिकरणाच्या रस्ते-दुरुस्ती पथकाला ज्यांनी ऐन पुलावर सहा बाय सहाचा ब्लॉक अडवून, तिकडे खोदकाम चालवलं होतं. बहुतेक पेवर-ब्लॉक बसवत होते. थोडा अजून पुढे गेलो तर प्रियदर्शिनीची ट्रॅफिक. त्यातून कसाबसा सुटलो तर सायन सर्कलची ट्रॅफिक. तिकडून पुढे जात-जात सायनचा तो एकपदरी पूल पार केला आणि खाली बघतो तर जिकडे बघेल, तिकडे गाड्याच गाड्या. डोकंच सटकलं. म्हंटले आता खड्ड्यात गेलं सगळं काम. गाडी फिरवली आणि घरी आलो. जाऊन येऊन माझे तीन तास गेले. काम तर काहीच नाही, पण उगाच पेट्रोल जाळून आलो.

Monday, July 4, 2011

दूरसंचार जातीच्या विळख्यात



काल दुपारी सकाळने दिलेल्या बातमीनुसार भारत संचार निगम लिमिटेड, जे महानगरे वगळता बाकी पूर्ण भारतात दुरसंचाराची जबाबदारी पार पाडते, यांनी एक योजना जाहीर केली आहे. 'ओबीसी टू ओबीसी' असे या योजनेचे नाव असून या अंतर्गत मंडल आयोगात समावेश असलेल्या ३५७ जातीच्या, राज्यातील सुमारे सहा कोटी इतर मागासवर्गीय जनतेस यामुळे अमर्यादित गप्पा मारता येतील. आतापर्यंत फक्त सरकारी कार्यालये आणि खाजगी उद्योगांपूरती उपलब्ध असणारी 'क्लोज्ड युजर ग्रुप' या सेवेच्या वापरातून या इतर मागासवर्गीय जनतेसाठी अवघ्या ९० रुपयांत स्वतःच्या नेटवर्कवर १०० मिनिटे, इतर नेटवर्कवर २०० मिनिटे, २५० एसएमएस, १०० एमबी जीपीआरएस कनेक्शन आणि खास आकर्षण - याच सेवेचा लाभ घेणाऱ्या दुसऱ्या इतर मागासवर्गीयांस अमर्यादित कॉल्स.

कलयुगी प्रताप!



नुकताच फेसबुकवर नवीन चालू झालेल्या प्रश्नोत्तराच्या तासात एक प्रश्न फिरत-फिरत आला की दिलेल्या यादीतील कुठल्या-कुठल्या गोष्टी (इथे अर्थ : किडे) तुम्ही तुमच्या महाविद्यालयीन जीवनात केल्या आहेत. त्यात बाकी तर दैनंदिन उपक्रमाची यादी होती, पण त्याच्या अनुषंगाने मी डिप्लोमाला असतानाचा एक किस्सा आठवला. म्हंटला तर साधा, पण प्रासंगिक विनोद! या निमित्ताने माझ्या किडेकरू मित्रांच्याही आठवणींना उजाळा.

Wednesday, June 22, 2011

मुंडावळ्यांचा बाजार


लगिनसराईत ऐन भरला मुंडावळ्यांचा बाजार
लावणार नेमका कोण, माथी तयार बसली हजार

झाली बोंबाबोंब, बाजारात उतरले सारे व्यापारी,
धजवेना कुणी मात्र, फोडायला आपणहून सुपारी,

बछड्याला काही काम ना धंदा, उगाच घासाघीस
गडकऱ्यांचा जीव तिकडे झाला ना कासावीस

Saturday, April 30, 2011

Top 10 Pages of April '11



बघता बघता महिना संपला. आता कुठे एप्रिल चालू झाला होता. विश्वचषक जिंकला, अण्णा-प्रकरण उरकले, IPL चालू झाल्या आणि सेम संपत आली. सगळ्या घटना इतक्या दणादण घडल्या की महिना कुठे उलटला कळलंच नाही. या सेमच्या बाकी महिन्यांप्रमाणे हा देखील प्रचंड धावपळीचा महिना. हा लेख प्रकाशित झाल्यानंतर जेमतेम दोन आठवडे कॉलेज - त्यातच परीक्षा आणि एकदा सगळ्यातून सुटलो की मग थेट मुंबई. पुढचा Top 10 of The Month मुंबईत बसून लिहिणार. उफ्फ, निदान तितकाच दिलासा. सतरा महिन्यांनंतर पुन्हा मुंबईला येतोय. त्यानंतर परत कधी योग येईल लवकर माहित नाही. त्यामुळे ही संधी चांगलीच वसूल करून घ्यायचा मनसुबा आहे. दोन महिन्यांपूर्वी मी एका बातमीबद्दल सुतोवाच केले होते, तो विषय अजूनही टांगणीलाच आहे. त्यामुळे याही महिन्यात अधिकृत अशी घोषणा नाही. पण पुढच्या आपल्या मासिक अहवालात त्याचा उल्लेख होईलच, तोही जाहीर. नव्हे, तर पुढचा लेख त्याचभोवती असणार आहे.

Wednesday, April 20, 2011

गर्दीत वाट हुडकतोय...




रोज सकाळ होते , मी जागा होतो.

पूर्वीही सकाळ व्हायची मी जागा व्हायचो. उठून शाळेत जायचो , गर्दीत सामील व्हायचो , बे एके बे पासून, १० वि पर्यंत मी गर्दीत चालत राहिलो, लोक वक्तृतव स्पर्धेत भाग घेतात म्हणून मी ही घेत राहिलो , आणि अमुक एक क्लास चांगला आहे म्हणून मी पण जात राहिलो.

शाळा झाली , सगळे ११ वी / १२ वी करतात म्हणून मी ही केली , सगळे जण ढीग भरून फॉर्म भरतात म्हणून मी ही भरत राहिलो. शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो.

१२ वी नंतर सगळे कंप्यूटर क्षेत्रात जातात म्हणून मी पण गेलो. अमुक यांचा तो आणि तमुक यांची ती सध्या एमएनसी कंपनीमधे असते , इतके हजार पगार मिळतो हे ऐकत राहिलो , मी पण त्यांच्यातलाच व्हायच्या तयारीला लागलो.

अरे तो यूएस ला गेला , हा यूके हून आला , तो युरोप मधे सेट्ल झला हे ऐकत मी पण इंजिनियर होत गेलो. सगळे कॅम्पस मधे जातात तसा मी पण गेलो आणि पुन्हा एकदा त्याच गर्दीत एक दिवस सॉफ्टवेर इंडस्ट्री मधे उभा राहिलो.

शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो.

Saturday, April 16, 2011

उपवास



परवा एका मित्राशी गप्पा मारत असताना त्याने मला विचारले ''काय रे ,आज एकादशी ,उपास धरलास की नाही? हे वाक्य ऐकल्यावर मला तर आधी हसूच आले, अर्थात ते मित्रासाठी नाही तर उपास ह्या शब्दाबद्दल. उपास ह्या शब्दाचा संधीविग्रह केल्यास असे लक्षात येईल -

उपास =उप +आस

उप=जवळ जाने /राहणे इ.

आस=इच्छा ,आकांक्षा,मोह इ.

उपास=मोहाच्या जवळ राहणे

आता प्रश्न हा उरतो, मोहाच्या जवळ राहण्यासाठी एखादा वार, तिथी यांचे प्रयोजनच काय? ते तर आपण कधीही राहू शकतोच ना?

Wednesday, April 13, 2011

'अण्णा'मय



विश्वचषक जिंकला. अख्ख्या देशाने आनंद साजरा केला. त्यातून बाहेर पडतो ना पडतो इतक्यात IPL चे ढोल कानावर पडायला लागले. विविध समस्यांनी ग्रासलेल्या शासनाने लोकांना आपल्याच नादात गुंतलेले पाहून जरा निवांत श्वास घ्यावा म्हंटले तितक्यात अण्णा हजारे यांनी आमरण उपोषणाची ललकारी ठोकली. त्र्याहत्तर वर्षांच्या या तरुणाला अशी मैदानात मांड ठोकताना पाहून तरुणांना नवीन नेतृत्व आणि मिडीयाला नवे प्रकरण मिळाल्याचा आनंद झाला आणि सगळ्यांनी या आंदोलनाला अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले. स्वातंत्र्याची दुसरी लढाई म्हणवल्या गेलेल्या या जन प्रक्षोभाचे उग्र स्वरूप पाहून शासनाने देखील नमते घेतले आणि आंदोलनाची मूळ मागणी असलेल्या जन लोकपाल बिलासंबंधी ठोस पावले उचलण्याची तयारी दाखवली. एकूणच या पाच दिवसात भल्याभल्यांची हवा टाईट झाल्याचे चित्र उभे राहिले.

अण्णांनी आंदोलनाचे टाईमिंग चपखलपणे साधले. याचे बरेचसे श्रेय अण्णांना एकट्यांना जाते. ती त्यांची खासियत आहे. याचा उद्देश चांगलाच असावा, पण शरद पवार यांच्या शब्दात सांगायचे म्हंटले तर या वेळी अण्णांच्या समाजकारणाला राजकारणाची किनार दिसली. अण्णा यांच्या क्षमतेबद्दल शंकाच नाही. तरी देखील या एकूण आंदोलनाचा करविता धनी कुणी वेगळाच असावा अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. आता जेव्हा शासनाने संयुक्त समिती स्थापन करण्याची मागणी पूर्ण केलेली आहे आणि थकले-भागले अण्णा पुन्हा राळेगणसिद्धीला परतलेले आहेत, या आंदोलनाचे थोडे अवलोकन करायला हरकत नाही.

Thursday, March 31, 2011

K Special - Top 10 Pages of March '11



नमस्कार मित्रांनो,
कसं काय? बरं आहे? आमचंही सध्या उत्तम चालू आहे - निदान ब्लॉग संदर्भात तरी. गेल्या महिन्यांत अशा बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत ज्याबद्दल ब्लॉगवर लिहिणे आवश्यक वाटते मला. पण बाकी काही सुरु करण्यापूर्वी थोडं सध्या चालू असलेल्या एकूण रणधुमाळीबद्दल....

क्रिकेटचा विश्वचषक सोहळा ऐन रंगात आला आहे. मुळात साखळी-सामन्यांमध्ये आपल्या संघाचा एकूण खेळ पाहिला तेव्हा विश्वास बसत नव्हता की हा आपल्या देशातल्या सर्वोत्तम अकरा खेळाडूंचा performance आहे. त्यात इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसोबतच्या सामन्यांत तर आपल्या संघाचं विजयाच्या जबड्यातून पराभव खेचून आणण्याचं कौशल्य पाहून थक्कच झालो. कसबसं साखळी-सामने उरकून जेव्हा उपांत्य-पूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या समोर आलो, माझ्या हिशोबी तर आपलं आव्हान तेव्हाच संपुष्टात आलं होतं. पण आपल्या संघाने 'न भूतो न भविष्यति' असा खेळ दाखवून ऑस्ट्रेलियाच्या नाड्या वळल्या, तेव्हा कुठे प्रत्यक्ष विश्वचषक सुरु झाल्याची जाणीव झाली.

Thursday, March 3, 2011

Top 10 Pages of February '11



फेब्रुवारी महिना - प्रेमाचा महिना की असंच काहीतरी! आमच्या बाबतीत फेब्रुवारीला असं फार काही महत्व नाही. कारणे दोन - एक तर आमची anniversary जानेवारी संपताना येते, त्यामुळे सगळं celebration आधीच झालेलं असतं. दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं हे की आम्हा दोघांचे वाढदिवस फेब्रुवारीतच येतात. त्यामुळे १४ फेब्रुवारी आला काय आणि गेला काय, काही फरक पडत नाही. शिवाय इथे आल्यापासून नेमकं काय गडबड आहे माहित नाही, पण माझा वाढदिवस आणि आजारपण नेहमी एकत्रच येतात. याही वर्षी सालाबादप्रमाणे वाढदिवसाची सकाळ इस्पितळातच गेली. पण तरीही पुढचा दिवस चांगला गेला. शिजू नारायणने माझ्या वाढदिवसाची surprise पार्टी दिली आणि ती आम्ही खूप एन्जॉय केली. माझ्या वाढदिवसानंतर पुढच्या अवघ्या दहा दिवसांत लागोपाठ अमृता जायस्वाल, वैभव हडूळे, भावना पाटील, सुशांत कांबळे, शशांक देशपांडे, हर्षल तावडे, विनीत तेजे, निवेदिता कांबळे, दीप्ती बिसेन अशा सगळ्या जवळच्या मित्रांचे वाढदिवस येतात म्हणजे काय धमालच! मुंबईला असतो तर पार्ट्या घेऊन दमलो असतो म्हणायला हरकत नाही. पण थोडक्यात फेब्रुवारीला या सगळ्यांमुळे किंमत आहे माझ्या दृष्टीने, Valentine's day मूळे नाही.

Wednesday, February 2, 2011

Top 10 Pages of January '11


2011 has brought such a bad luck for Maharashtra's art industry, that within two month we have lost THREE great men - Pt. Bhimsen Joshi, Shahir Vitthal Umap and Prabhakar Panashikar. Thought of writing an article on them, but Avinash was already working on it and he writes way better than I do. As per the expectation - दोन तरुण has been written brilliantly. I recommend that article to each and every marathi person reading this.

December was too busy month. So busy that I could hardly find time to check this blog and it's stats. Even though I could publish three articles, I wasn't able to prepare our routine Top 10s of the month. College and work kept me busy this month too, but at least I'm publishing Top 10 of this month.

This month we have two good news -

Thursday, January 13, 2011

पानिपतची अडीचशे वर्षे



आज १४ जानेवारी, २०११. जगाच्या दृष्टीने भले काही फार मोठा दिनविशेष नाही. पण एक मराठी माणूस म्हणून आपल्या दृष्टीने आज फार मोठा आणि आठवणीत ठेवावा असा हा दिवस. आज पानिपतच्या तिसऱ्या आणि ऐतिहासिक युद्धाला अडीचशे वर्षे पुरी होत आहेत. खूपशा मराठी (म्हणविणाऱ्या) लोकांच्या हे ध्यानीमनी देखील नसते, की पानिपतचे हे युद्ध का महत्वाचे आहे.

Saturday, January 8, 2011

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!



मुळात थोडा उशीरच झाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला. पण हरकत नाही, अजून पुढचे साडेतीनशे दिवस हेच वर्ष राहणार आहे. त्यामुळे मी - वैभव गायकवाड आणि माझ्या परिवारातर्फे तुम्हां सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Related Posts with Thumbnails