नमस्कार मित्रांनो,
कसं काय? बरं आहे? आमचंही सध्या उत्तम चालू आहे - निदान ब्लॉग संदर्भात तरी. गेल्या महिन्यांत अशा बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत ज्याबद्दल ब्लॉगवर लिहिणे आवश्यक वाटते मला. पण बाकी काही सुरु करण्यापूर्वी थोडं सध्या चालू असलेल्या एकूण रणधुमाळीबद्दल....
क्रिकेटचा विश्वचषक सोहळा ऐन रंगात आला आहे. मुळात साखळी-सामन्यांमध्ये आपल्या संघाचा एकूण खेळ पाहिला तेव्हा विश्वास बसत नव्हता की हा आपल्या देशातल्या सर्वोत्तम अकरा खेळाडूंचा performance आहे. त्यात इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसोबतच्या सामन्यांत तर आपल्या संघाचं विजयाच्या जबड्यातून पराभव खेचून आणण्याचं कौशल्य पाहून थक्कच झालो. कसबसं साखळी-सामने उरकून जेव्हा उपांत्य-पूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या समोर आलो, माझ्या हिशोबी तर आपलं आव्हान तेव्हाच संपुष्टात आलं होतं. पण आपल्या संघाने 'न भूतो न भविष्यति' असा खेळ दाखवून ऑस्ट्रेलियाच्या नाड्या वळल्या, तेव्हा कुठे प्रत्यक्ष विश्वचषक सुरु झाल्याची जाणीव झाली.
फेब्रुवारी महिना - प्रेमाचा महिना की असंच काहीतरी! आमच्या बाबतीत फेब्रुवारीला असं फार काही महत्व नाही. कारणे दोन - एक तर आमची anniversary जानेवारी संपताना येते, त्यामुळे सगळं celebration आधीच झालेलं असतं. दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं हे की आम्हा दोघांचे वाढदिवस फेब्रुवारीतच येतात. त्यामुळे १४ फेब्रुवारी आला काय आणि गेला काय, काही फरक पडत नाही. शिवाय इथे आल्यापासून नेमकं काय गडबड आहे माहित नाही, पण माझा वाढदिवस आणि आजारपण नेहमी एकत्रच येतात. याही वर्षी सालाबादप्रमाणे वाढदिवसाची सकाळ इस्पितळातच गेली. पण तरीही पुढचा दिवस चांगला गेला. शिजू नारायणने माझ्या वाढदिवसाची surprise पार्टी दिली आणि ती आम्ही खूप एन्जॉय केली. माझ्या वाढदिवसानंतर पुढच्या अवघ्या दहा दिवसांत लागोपाठ अमृता जायस्वाल, वैभव हडूळे, भावना पाटील, सुशांत कांबळे, शशांक देशपांडे, हर्षल तावडे, विनीत तेजे, निवेदिता कांबळे, दीप्ती बिसेन अशा सगळ्या जवळच्या मित्रांचे वाढदिवस येतात म्हणजे काय धमालच! मुंबईला असतो तर पार्ट्या घेऊन दमलो असतो म्हणायला हरकत नाही. पण थोडक्यात फेब्रुवारीला या सगळ्यांमुळे किंमत आहे माझ्या दृष्टीने, Valentine's day मूळे नाही.