सहसा मला टीव्ही बघायला, त्यात पण सिनेमे बघत बसायला वेळ नसतो. पण हौस भारी. त्यावर उपाय म्हणून मी जेवायला बसलो की एखादा चित्रपट लावून बसतो. तेवढाच २०-३० मिनिटांचा चित्रपट बघून होतो. उरलेला दुसऱ्या दिवशी. अशा पद्धतीने एकच चित्रपट कधी चार तर कधी आठ दिवस सुरु असतो. असाच एकदा मी जेवत चित्रपट बघत बसलो होतो. चित्रपट शेवटच्या टप्प्यात होता, तितक्यात माझा एक मित्र घरी आला. मी चक्क शारुकचा चित्रपट बघत बसलोय म्हणून तो पण माझ्यासोबत बघायला बसला. शेवटची जेमतेम वीस-एक मिनिटे आम्ही बघितली असतील. माझं जेवण आणि चित्रपट दोन्ही संपले. मित्राने विचारलं, "चांगला आहे काय? कशावर बघत होतास?" मी सांगितलं की नेटफ्लिक्सवर आहे आणि बकवास आहे एकदम. दुसऱ्या दिवशी कामावर आलो, तितक्यात त्याच मित्राचा फोन. सुरावरून चांगलाच वैतागलेला दिसत होता. मला बोलला, "च्यायला, गंडवलास मला. काल तुझ्या सांगण्यावरून मुव्ही बघत बसलो. त्यात तो शारूक येडझवसारखा काहीतरी करत होता." आता तो नेहमीच तसा करतो, त्यामुळे मित्राचं काय बिनसलंय आणि नेमका माझ्यावर का वैतागलाय मला कळेना. मित्र पुढे बोंबलतच होता, "चांगला action movie वाटला म्हणून बघायला घेतला, तर तो शारूक फुल-टाईम नो-नो-नो वरती अडकलेला. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्याचं नो-नो आणि आय हेट येल्लो याच्यापुढे काय जाईना. मला वाटलं त्याचा पोरगा मेला म्हणून आता हातात बंदूक घेईल, लोकांना गोळ्या मारत सुटेल. पण त्याचं आहे तेच पालुपद सुरु. नंतर त्याचा accident झाला, वाटलं आता तरी तो बरा होईल, पण तो काय त्याचा नखरा सोडेना. काहीतरी होईल याची वाट बघत अख्खा पिक्चर संपला पण action काय कुठे दिसली नाही". मला कळेना हा काय बोलतोय. मी विचारलं, "नेमका कुठला पिक्चर बघत होतास तू?" "माय नेम इज खान", मित्र बोलला. मी कपाळावर हात मारून घेतला. "तरीच मला कळेना तू कुठल्या चित्रपटाचं सांगतोयस, मी तो बघितलेलाच नाही", मी म्हंटलं, "मी डॉन २ बघत होतो". मित्र मात्र काही ऐकेना. शिव्यांची लाखोली वाहूनच त्याने फोन ठेवला. आता यात माझी काय चूक? नशीब त्याच्या मायला रा-वन नाही लावला चुकून. नाहीतर माझा खूनच केला असता.
परवाची गोष्ट. रिकामाच होतो. वेळ काढायला म्हणून नवीन आणलेल्या स्केट-बोर्डावर सराव करत होतो, घरामागच्या पार्किंग लॉटमध्ये. आता आता कुठे त्यावर मला जेमतेम उभं राहता येतंय. थोडा वेळ सराव करून आत येत होतो तर माझा रूम-मेट बाहेर आला. "मला पण सांग कसं करायचं?" बोललो, "अरे सोपंच आहे. कधी चालत्या ट्रेनमध्ये चढला नाहीस काय? सेम टेक्निक". त्याच्याकडे स्केट-बोर्ड देऊन मी घरात आलो. माझ्या रूममध्ये बेडवर पडून टीव्ही बघत बसलो. जेमतेम पाच मिनिटांत तो रूममध्ये आला, आणि वसकन अंगावर खेकसला, "तू आणि तुझं भिकारचोट टेक्निक. ढुंगण शेकून निघालं माझं. काय तर म्हणे चालत्या ट्रेनमध्ये चढण्यासारखंच आहे". मी म्हंटलं, "अरे, तसंच आहे. फरक इतकाच आहे की इथे तुला धरायला खांब नाहीये दारातला". असला वैतागला माझ्यावर. "भडव्या, बिना-खांब धरता तुझा बाप तरी चढलेला काय चालत्या ट्रेनमध्ये?" मी चुपचाप तोंडावर चादर घेऊन झोपलो. माझी काय चूक?
वैभव गायकवाड
मागील आठवड्यात दिल्लीत झालेल्या बलात्काराने चांगलीच खळबळ उडवलेली आहे. अर्थात दिल्लीसारख्या शहरात बलात्काराच्या आणि विनयभंगाच्या घटना सर्रास घडत असल्या तरी यावेळच्या प्रसंगातील एकूणच अमानुषपणा धक्कादायक आहे. गुजरातच्या प्रचार-निवडणुकांपासून निकालापर्यंत मिळालेला मोकळा वेळ माध्यमांनी सदर बलात्काराच्या नावे खपवून जो गाजावाजा केलाय त्याला काही तोड नाही. त्यात साथ मिळाली सोशल मिडीयावरील नवक्रांतीकारांची. अपुऱ्या ज्ञानावर अक्कल पाजळून, काळ्या वर्तुळांचे प्रोफाईल फोटोज लावून आणि आपला टंक-सक्रिय सहभाग नोंदवून या तरुणांना जर सामाजिक जाणिवांची कदर आहे, असे फक्त दाखवायचे असेल तर त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले आहेत म्हणायला हरकत नाही. बलात्कारी पुरुषांना फाशीची शिक्षा देण्यापासून चक्क लिंग छाटण्यापर्यंतची मागणी करणारे हे नवक्रांतीकारी आधुनिकतेच्या मुखवट्याखाली कसली मध्ययुगीन मानसिकता बाळगत आहेत, हा चिंतेचा विषय आहे. '२१ अपेक्षित'वाल्या या पिढीला प्रकरण समजून घेण्यापेक्षा 'काँग्रेस मुर्दाबाद'ची घोकमपट्टी करण्यात आणि बाजूच्या पेपरातली उत्तरे उतरवून घेण्यात जास्त रस दिसतोय. अशावेळी प्रासंगिक विधाने करण्यापेक्षा प्रसंगावर आणि पर्यायाने प्रतिबंधात्मक उपायांवर विचार करणे जास्त योग्य आहे, पण तितकी मेहनत कोण करणार?
सर्वात आधी 'बलात्काराला फाशीची शिक्षा' या मागणीला खोडून काढणे जरुरी आहे. खुनाला फाशीची शिक्षा दिली जाते. बलात्कारानंतर पिडीत महिला निदान जिवंत तरी राहते. फाशीची शिक्षा मिळतेय म्हंटल्यावर ओळखपरेड करण्यासाठी महिलेला जिवंत सोडण्याची चूक बलात्कारी कशाला करेल? त्यापेक्षा त्याचा भर बलात्कारानंतर खून करून पुरावे नष्ट करण्याकडे असेल, यात शंकाच नाही. पकडला गेला तर शिक्षा आणि अनोळखी माणूस, त्यामुळे पकडले जाण्याचे चान्सेस पण कमी. याने बलात्कारांचे प्रमाण कमी कसे होईल? 'भीक नको पण कुत्रं आवर' सारखी परिस्थिती असेल ती. त्यामुळे फाशीच्या शिक्षेच्या मागणीत काही दम नाही. शिवाय बलात्कार करणारा माणूस जर मुळातच परिणामांचा विचार करत नसेल, तर नंतरच्या कठोर शिक्षेचे भय दाखवणार कुणाला? आपल्या न्याय-व्यवस्थेतल्या त्रुटींचा आधार घेऊन विनयभंग-बलात्कारांचे कित्येक खोटे आरोप लागतात, खुद्द लोकमान्य टिळक त्यात अडकू शकतात तर सामान्यांचे काय बोलावे? त्यामुळे परिणामांची भीती घालण्यापेक्षा प्रतिबंधाकडे जास्त लक्ष पुरवलं पाहिजे.
बलात्कार/विनयभंग टाळण्यासाठी मुख्यत्वे तीन मार्ग आहेत. सामाजिक शिक्षणातून महिला-सबलीकरणाकडे लक्ष देणे जितके महत्वाचे आहे, तितकेच महत्वाचे आहे आपल्या सभोवतालच्या महिलांना आदरपूर्वक वागणूक देणे. कुठल्याही इतर गुन्हेगाराप्रमाणे बलात्कार करणारा देखील सामाजिक जडणघडणीत उपेक्षित राहिलेला असतो, म्हणून विकृती दुर्लक्षित राहते. जेव्हा पूर्ण पिढीचा प्रश्न आहे तेव्हा पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष निरीक्षणातून शिकण्याची संधी प्राप्त करून देणे तितकेच जरुरीचे असते. आपल्याकडे घरांत, कार्यालयांत इतकेच काय तर टीव्ही/सिनेमांतसुद्धा बाई हा प्रत्यक्ष उपभोगाचा नसला, तरी फारसे लक्ष न देण्याचा विषय असतो. समाजाच्या निम्म्या घटकाकडे पाहण्याची ही वृत्ती नंतर त्यांच्या अनादराकडेच झुकत जाते. 'घरी काही काम करायचेय - बायकोला विचारायची काय गरज आहे?' हा दृष्टीकोन नंतर 'आईला विचारायची काय गरज आहे?' करत पुढच्या पिढीकडे जातो. घरात मुलगा असेल तर मुलीकडे दुर्लक्ष होत जाते, नसेल तर मुलींचे आणि पर्यायाने आईचे हाल कुत्रं विचारत नाही. शहरी मानसिकतेतसुद्धा हा दृष्टीकोन असतोच, तर मग ग्रामीण भारताची काय कथा? लहानपणी जर मुले हे शिकली नाहीत, तर मोठेपणी त्यांचा स्वभाव स्त्रीयांप्रती कसा असेल? त्यामुळे निदान पुढच्या पिढीला तरी या फेऱ्यातून वाचवता येणे शक्य आहे. हा एक दीर्घकालीन उपाय म्हणून राबवायला काय हरकत आहे?
दुसरा मार्ग थोडा वादग्रस्त होऊ शकतो. कारण असे बोलणाऱ्याला आपलाच बेगडी समाज मागास-वृत्तीचा बोलून मोकळा होईल. समाजाने स्त्रीयांवरती बंधने घालण्यापेक्षा स्त्रीयांनी स्वतःवर काही बंधने घालून घेणे आवश्यक आहे. हा त्यांच्या स्वातंत्र्यावरचा घाला न समजता, स्वतःच्या सुरक्षेचा उपाय समजावा. याबाबतच्या बऱ्याच टीप्स ऑनलाईन गुगलवर 'Avoid Rape' म्हणून सर्च केल्यास मिळतात, त्यामुळे त्यासाठी इथे वेगळी जागा घालवण्यात अर्थ नाही. इथे मात्र गरज आहे स्त्री-वर्गाने स्वतःहून पुढाकार घेऊन प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्याचे.
तिसरा आणि अत्यंत किफायतशीर उपाय आहे मोहल्ला कमिटीचा. आता निवृत्त झालेल्या पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांनी भिवंडीत राबवलेल्या या संकल्पनेने धार्मिक तेढ सोडवण्यात मदत झाली (या विषयावरचे Why Mumbai Burned …and Bhiwandi Did not हे पुस्तक वाचनीय आहे). २००४ मध्ये नागपुरात झालेल्या अक्कू यादव खून-प्रकरणानंतर पोलिस खात्याने समाजातील चीड लक्षात घेऊन जनतेचे सहकार्य स्वीकारले आणि भिवंडीच्या धर्तीवर नागपुरात ठिकठिकाणी मोहल्ला कमिट्या स्थापन झाल्या. मोहल्ला कमिटीच्या एकूण कार्यपद्धतीची बावीस तत्वे सुरेश खोपडे यांच्या वेब-साईटवर वाचायला मिळतात. नागपुरात अशा पद्धतीच्या स्थानिक पहाऱ्यामुळे महिलाच नव्हे तर एकूण समाज सुरक्षित होण्याकडे वाटचाल होऊ लागली आहे. अर्थात इथे सगळ्यात मोठा धोका आहे या गर्दीकडून कायदाभंग होण्याचा. अवघ्या सात महिन्यांपूर्वी नागपुरातच भारतनगरच्या आभा कॉलनीत गावोगाव बहुरुप्यांचे खेळ करून पोट भरणाऱ्या तीन जणांना नागरिकांनी संशयाखाली मारहाण केली, ज्यात तिघांचा मृत्यू झाला. या बाबतीत समाजाने कायदा हातात न घेणे गरजेचे आहे.
हे उपाय फक्त दाखल्यासाठी दिलेले आहेत. अजून उपाय असल्यास त्यावर चर्चा जरुरी आहे. म्हणून प्रसंगावर चर्चा करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपायांवर चर्चा करण्याला प्राध्यान्य द्यावे. निदान त्यामुळे 'बलात्कार एकतर अनोळखी माणसांकडून होतो किंवा ओळखीच्या' असे useless स्टेटस टाकणारे मागे पडतील आणि चोख उपाय शोधण्या/राबवण्यावर भर देत येईल.
वैभव गायकवाड
इतिहास माझा मुळात आवडता विषय. सनावळ्या कधी लक्षात नाही राहिल्या, तरी कुठली तरी एखादी गोष्ट अशी घडून गेली ज्यामुळे आजही आपण काही उपचार पाळतो, हे कळण्यातला आनंद इतिहासातून खूप मिळाला. आजच्या लेखातून इतिहासातील क्लिष्ट घटना चघळायचा उद्देश अजिबात नाही. उलट आपल्या आजच्या अजून एका आवडीच्या विषयाचा इतिहासात संदर्भ धुंडण्याचा प्रयत्न. आणि ती गोष्ट म्हणजे - खाणे.
परंपरागत खाद्यपदार्थ म्हणा वा काही प्रसंगनिष्ठ पदार्थ, प्रत्येकामागे असेच एखादे कारण असते. एरवी खाताना आपण कसलाच विचार करत नाही. पण हा पदार्थ असाच का बनवतात आणि आपण तो कधीपासून खातोय हे जाणून घेणे खरेच मजेशीर असते. जसं गायीचे दुध भलेही आज आपल्या दैनंदिन जीवनातला महत्वाचा भाग आहे. पण मागे एकदा कुठे तरी वाचले होते, कुणी सर्वप्रथम असा विचार कसा केला असेल की 'ते जे गाईच्या खाली लोम्बतंय, ते पिळावं आणि त्यातून जे काही बाहेर येईल ते प्यावं'? विनोदाचा भाग सोडला, तरी कुतूहल माणसाला छळत राहतंच. आणि मग मागे एकदा माझ्या पानिपतच्या लेखात संक्रांतीला तीळगुळ खाण्याचा उल्लेख आलेला, त्यावरून बऱ्याच जणांनी सांगितलं की त्यांना कधी कल्पनाही नव्हता की या तीळगुळ प्रकरणाचा पानिपतच्या पराभवाशी काही संबंध असेल. असेच एक दोन प्रसंग घडून गेले. आणि मग शेवटी हा लेख साधत गेला.

काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. कामावरून घरी चाललो होतो. सिग्नलला माझ्या पुढे एक २०११ ची फोर्ड मस्टँग होती. सिग्नलला थांबल्यामुळे आजूबाजूला बघत बसण्याशिवाय दुसरे काही काम नव्हते. सहज लक्ष गेलं मस्टँगच्या पेट्रोलच्या टाकीच्या झाकणाकडे. मस्टँगवाला नुकताच कुठून तरी पेट्रोल भरून निघाला असावा. आणि गडबडीत पेट्रोलच्या टाकीचे झाकण लावायला विसरला असावा. त्याच्या टाकीचा मेटल flap उघडा होता, शिवाय आतली रबरी कॅपसुद्धा बाहेर लटकत होती. हा बहुतेक पेट्रोल भरून सरळ गाडीत बसला आणि ते बंद न करता थेट निघाला, असा माझा अंदाज. विचार केला की आताच उतरावं आणि त्याच्या खिडकीला टकटक करून त्याला सांगावं. तेवढ्यात सिग्नल हिरवा झाला आणि गाड्या हलल्या. सिग्नल, मग ते भले कुठल्याही देशातले असेनात, आपण जेव्हा गडबडीत असतो तेव्हा नेहमी लाल असतात, आणि जेव्हा थांबून काही करायची गरज असते तेव्हा हमखास हिरवे असतात. पिवळ्या सिग्नलला एरवीही कुणी किंमत देत नाही म्हणा.
तर मी त्या मस्टँगच्या मागून निघालो. आता खरंच असं होतं की नाही मला माहित नाही, पण समोरची गाडी जशी हलेल तसं त्या टाकीच्या उघड्या तोंडातून पेट्रोल बाहेर सांडत असल्यासारखे मला वाटत होते. आम्ही दोघे डाव्या लेनमध्ये होतो. मी उजव्या लेनला गाडी टाकली आणि खेचून त्या मस्टँगच्या बरोबरीला आणली. साठीच्या आसपासचा एक म्हातारा ती मस्टँग चालवत होता. हे म्हातारे लोक अशा स्पोर्टस-कार का चालवत असतील असा मला नेहमी प्रश्न पडतो. बहुतेक शोरूमवाले त्यांना 'उतारवयात चालवण्यासाठी आरामदायक गाडी' देण्याऐवजी कमिशन जास्त म्हणून अशा स्पोर्टस-कार चिकटवत असतील किंवा पान पिकलं तरी देठ अजून हिरवा असल्याने तरुण पोरींना किंवा सेकंड हँड बायकांना भुलवण्यासाठी या म्हाताऱ्यांचाच हा खटाटोप असावा. असो.
गेल्या गुरुवारी मी कामावरून येताना गाडीची टाकी पार रिकामी झाली होती. घरी पोहोचतोय की नाही हा doubt. कसा-बसा घरापर्यंत आलो. मी ज्या कॉलनीत राहतो, त्याच्या अगदी दारातच एक पेट्रोलपंप (गॅस-स्टेशन) आहे. पेट्रोल भरायचे लक्षात नाही, तसाच घरी गेलो. नंतर मित्रासोबत बाहेर चाललो होतो तेव्हा पहिला पेट्रोलपंपाला थांबलो. कार्ड स्वाईप केलं. आणि पेट्रोल भरायला सुरुवात केली. इथे पेट्रोल भारतापेक्षा स्वस्त आहे. इथे जसं पेट्रोलला गॅस म्हणतात, तसंच मापायला सुद्धा लिटरच्या ऐवजी गॅलन हे एकक वापरतात. एका गॅलनला $3.39 असा रेट होता. माझ्या गाडीची टाकी आहे 10 गॅलन. माझ्या अंदाजानुसार काटा कितीही खाली गेला तरी अंदाजे पाव गॅलन पेट्रोल तरी तळाला असायला हवे. म्हणजे जेमतेम पावणे दहा गॅलन पेट्रोल बसायला हवे. पंपाचा काटा मात्र चक्क 10.79 वर जाऊन थांबला आणि मग कट-ऑफ झाला. माझ्या लेखी जे जेमतेम $30-32 मध्ये उरकायला हवे, त्यासाठी चक्क $37 गेले. तेव्हा गडबडीत होतो म्हणून लगेच गाडीत बसलो आणि निघालो. काल घरी जाताना पेट्रोल परत सगळं संपलं होतं. परत त्याच पेट्रोलपंपावर थांबलो. विचार होता - आज पण तसंच झालं तर राडाच करायचा. रविवार सकाळ असल्याने गर्दी तुरळक होती. मागच्या वेळेचा पंप मात्र नेमका यावेळी बिझी होता म्हणून दुसऱ्या पंपावर कार्ड स्वाईप केलं. पेट्रोल भरलं. पंप व्यवस्थित 9.79 भरून झाल्यावर बंद झाला. चार दिवसांत पेट्रोलची किंमत पण वाढून $3.53 झालेली होती. $35.18 झाले. मग मी आत गेलो.